एका हाताने टाळी वाजवणारे


समाजात सध्या एका हाताने टाळी वाजवणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. यासंदर्भात प्रत्यय घ्यायचा म्हटले तर कोणत्याही दोन व्यक्ती मध्ये कोणत्याही कारणास्तव सुरु असणारा कलह-वादंग पहा जो-तो स्वतःला निष्पाप-निरागस तसेच निर्दोष समजतो सोबत दुसऱ्याला दोषी- गुन्हेगार मानतो, तत्सम दावा करतो.
कोणत्याही कलहात-विवादात-भांडणात दोन पक्ष असतात. जर एकच पक्ष असेल तर कलह-भांडण-विवाद होत नाही. कोणत्याही भांडणात सहभागी असणारे व्यक्ती दोष एकमेकाच्या माथी मारण्याचा प्रयन्त करतात. बऱ्याचदा कलहाचा मुद्दा राहतो बाजूला व हमरी-तुमरी ते गुद्देगिरी सुरु होते. काही व्यक्ती निखळ मुद्देगिरी करताना समग्र खानदानाचा देखील भूतकाळ काढतात तेच काही सात पिढ्यांचा उद्धार करण्यात धन्यता मानतात. थोडक्यात व्यक्तीचा स्वभाव त्याप्रमाणे त्याचे आचरण असते.
दोन भांडी एकमेकावर आदळत-आपटत नाहीत तो पर्यंत आवाज निर्माण होत नाही. त्याच प्रमाणे दोन व्यक्ती मध्ये टकराव होत नाही तो पर्यंत कलह होत नाही. ज्या दोन व्यक्तीमध्ये टकराव होतो त्या दोघांची संयुक्त जबाबदारी-चूक-दोष असतो. मात्र मानव स्वभावानुसार दोष-जबाबदारी दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयन्त करतो. दुसरा कसा व किती नालायक आहे याबद्दल सांगण्याचा व सिद्धता प्रदान करण्याचा प्रयन्त करण्यात येतो. मात्र स्वतःचे परीक्षण करून माझे काही चुकते का? याचा विचार केला जात नाही. अर्थात यामागे परपरीक्षण करण्याचा संस्कार व संस्कृती यांची भूमिका निर्णायक आहे.
आम्ही ज्या संस्कार व संस्कृती मध्ये वाढलो किंवा वाढत आहोत यामध्ये दुसऱ्यांचे परीक्षण करणे तसेच दुसऱ्यांचे निर्णायक होणे, दुसऱ्यांची पात्रता-लायकी-उद्देश ठरवणे यांचा समावेश आहे. थोडक्यात दृष्टी हीच सृष्टी मानत वाटचाल करताना आपण कोणत्या दृष्टीने अथवा चष्यातून पाहतो याला दुर्लक्षित करणे याचा संस्कार घडला आहे. भारतीय संस्कृती मध्ये कधी काळी एकत्र कुटुंब पद्धत होती मात्र एकत्र ते विभक्त कुटुंब करताना जे काही घडले, त्या काळात याप्रकारचे संस्कार व्यापक प्रमाणात झाले.
कोणत्याही घरातील कोणत्याही प्रकारचे वादंग असो की कुरबुर असो प्रत्येक घटक दुसऱ्यांना दोषी ठरवतो तसेच मी योग्यच आहे असा अट्टाहास करतो. यामागे मी योग्य असा संस्कार आहे तसेच मी योग्य तर मी चूक करणार नाही किंवा चुकीचा नाही या प्रकारची ग्राह्यता येते. माणूस स्वतःची दृष्टी असो की आकलन अथवा समज यांना ग्राह्य ते सत्य मानत वाटचाल करतो परिणामी संघर्ष घडतो कारण समोरचा व्यक्ती हाच प्रकार करतो.
आम्ही आज जगाची माहिती गोळा करो तसेच माहिती आहे पण स्वतःच्या स्वभाव तसेच स्वाभाविक कृती संदर्भात अनभिज्ञ आहोत. आम्हाला स्वतःची दृष्टी, आकलन तसेच त्यांच्या मर्यादा संदर्भात ना माहिती ना जाणीव ना भान परिणाम स्वरूप आम्ही स्वतःला निर्दोष, निरागस व निष्पाप समजतो मात्र समज हाच गैरसमज आहे.
थोडा प्रयन्त करून एका हाताने टाळी वाजवण्याचा प्रयन्त करून पहा किंवा एकाच वेळी एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू पाहण्याचा प्रयन्त करून पाहावा. समोरच्याला नियंत्रित करण्याचा आम्हाला ना अधिकार ना पात्रता मात्र स्वतःला नियंत्रित करता येते. एका हाताला भिडणारा आमचा हात आम्ही रोखला तर टाळी वाजणार नाही. थोडक्यात प्रतिक्रिया वा प्रत्युत्तर मिळाले नाही तर वादंग पेटत अथवा भडकत नाही. बघा जमते का?   

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते