इतिहासाचे तुणतुणे वाजवण्यापेक्षा......
कोणत्याही देशातील नागरीक हा त्याच्या देशाच्या गौरवशाली
इतिहासाचा अभिमान बाळगतो तसेच गुणगान करतो कारण मानवी स्वभाव तसेच स्वभावातील
अहंकार. मानवी स्वभावातील अहंकार हा स्वतःचे दोष झाकतो तसेच इतरांच्या गुणांना
अवगुण-दोष ठरवतो. अहंकारी स्वभाव स्वतः मध्ये बदल न करता इतरांच्यात बदल घडवण्याचा
प्रयन्त करतो कारण एकतर स्वतःला निर्दोष समजतो तसेच स्वतःला परिपूर्ण समजतो.
वास्तवात जिथे अहंकार तिथे अज्ञान आहे किंबहुना अज्ञान त्याच ठिकाणी अहंकार आहे.
अहंकार त्याठिकाणी परपरीक्षण होणार यामध्ये शंका नाही तसेच
आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयन्त होणार यामध्ये शंका नाही. सध्या भारतीय
समाजात हाच प्रकार घडत आहे यामुळे अनुभवाचे शहाणपण येत नाही या विदारक वास्तवाला
नाकारता येत नाही.
महाराष्टात कधी काळी औरंगजेब, निजाम तसेच आदिलशाही होती
तसेच यामध्ये शिवरायांनी स्वराज स्थापन केले. आज शिवरायांना आदर्श मानणारे व्यापक
प्रमाणात आहेत मात्र यापैकी किती जणांचे आचरण शिवरायांच्या सारखे आहे. छत्रपती
शिवाजी महाराज यांनी काय आरक्षण मागितले होते की कधी कोणाचा द्वेष केला होता?
शिवरायांनी परकीय तसेच स्वकीय असा दुहेरी संघर्ष केला. मात्र आज परकीय होते
त्याच्या कडे बोट दाखवताना स्वकीयांना साफ दुर्लक्षित करण्यात येते ते का? अर्थात
हे स्वकीय एकाच जात-पात वा धर्म यापुरते मर्यादित नव्हते मात्र सध्या एका विशिष्ट
जाती संदर्भात द्वेष का? किंबहुना कोणत्याही व्यक्ती वा समाज संदर्भात द्वेष का?
आम्ही भारतीय इतिहासाचा जर आत्म परीक्षनात्मक अभ्यास केला
तर स्वकीयांच्या मधील दुफळी तसेच द्वेष यामुळे निर्माण झालेला ऐक्याचा अभाव
प्रकर्षाने जाणवतो हाच द्वेष, दुफळी, ऐक्याचा अभाव वर्तमान काळात आहे किंबहुना
त्याचे प्रमाण व्यापक होत आहे. परकीयांनी या दुफळी व द्वेषाचा फायदा घेतला की
त्यांना फायदा देण्यात आला हा भाग वेगळा आहे. मुळात त्याकाळात एक राष्ट्-देश
म्हणजे एक राजा व त्याचे राज्य होते तसेच दोन शत्रू एकत्र येत. यामुळेच गझनीचा
महंमद असो की इंग्रज यांच्या सोबत युती करून शत्रूचा नयनाट करता करता सगळ्यांचा
नयनाट झाला.
भारतावर ज्यांनी आक्रमण केले ते सरस ठरले किंवा त्यांच्या
ताकद समोर आमची ताकद तोकडी पडली याला दुर्लक्षित करण्यात येते त्यामुळे ताकद कमी
पडण्याचे कारण शोधले जात नाही. ताकद नव्हती असे नाही तर ती गट-तट, जात-पात, धर्म,
प्रांत यामध्ये विखुरलेली होती. तत्कालीन आपला-परका या संकल्पना भिन्न होत्या याचा
कधी विचार केला का? तर नाही कारण आजही आम्ही विखुरलेले आहोत. किंबहुना या
भेदभावांना अधिक खतपाणी घालण्यात येत आहे. जात-पात, भाषा, प्रांत, धर्म यांच्या
नावाने माणूस झिंगतो व आवेग-आवेश ग्रस्त होत नसते उपद्व्याप करतो.
आज आम्ही गौरवशाली इतिहात डोकावताना कधी ऐक्याचा अभाव,
परस्परातील सामंजस्याचा अभाव असो की द्वेष कधी पहिला का? त्यामध्ये सुधारणा
करण्याचा प्रयन्त केला का? इतिहासात काही गौरव आहेत त्याप्रमाणे कलंक आहेत त्याची
कधी लाज बाळगली का? जर अभिमान बाळगतो तर लाज देखील बाळगली पाहिजे.
ऐक्याचा अभाव असो की परस्परातील द्वेष, चातुर्वण्य असो की
जातीयवाद, परस्परातील शत्रुत्व असो की व्यक्तिगत फायद्यासाठी इतरांना दगाफटका
करण्याची मानसिकता यांची आम्ही लाज बाळगली पाहिजे तसेच या ऐतिहासिक घटना पासून
आत्म परीक्षनात्मक अर्थबोध घेण्याची गरज आहे.
आज छत्रपती असो की महात्मा फुले अथवा आंबेडकर की
टिळक-सावरकर थोडक्यात कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तींचा आदर्श बाळगणाऱ्या समाजात
पुन्हा याप्रकारच्या व्यक्ती घडल्या का? त्यांनी त्यांचे कर्तुत्व केले व इतिहास
घडला मात्र यांचा आदर्श सांगणारे कर्तुत्व न करता आहे तो वर्तमान बिघडवत आहेत
अर्थात त्याला घडवणे समजतात. वास्तवात घडते तिथे बिघडते याचे भान राखण्याची गरज
आहे. दुसऱ्यांच्या कर्तुत्वाची गाथा गाण्यापेक्षा स्वतःचे कर्तुत्व घडवण्याची गरज
आहे म्हणजे जेणे करून येणारी पिढी व इतिहास आमच्या गाथा गाऊ शकेल अन्यथा आम्ही
येणाऱ्या इतिहासाचे कलंक ठरणार आहोत. तसेच भावी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही.
इतिहास घडून गेला मात्र वर्तमान घडत आहे याकाळात जागरूक होत
आचरण केले तर येणारा इतिहास वेगळा असेल अन्यथा इतिहासाची तसेच ऐतिहासिक त्रुटींची
पुनरावृत्ती होणार हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची किंवा तज्ञाची गरज नाही.
थोडे आत्मपरीक्षण करून पहावे म्हणजे प्रत्यय मिळणार आहे.
Comments
Post a Comment