इतिहास:- तर्क-शक्यता आणि वास्तव.


इतिहास म्हणजे इत्यादींचा जो ऱ्हास झाला त्याचा मागोवा ते अभ्यास, स्मृती आहे.  इतिहास हा भूतकाळ आहे. प्रत्येक व्यक्ती असो की समाज अथवा निसर्गातील कोणताही घटक असो त्याला एक भूतकाळ-इतिहास आहे. काही व्यक्तींना भूतकाळात स्वारस्य असते तर काहींना भविष्यात स्वारस्य असते अर्थात ज्याची त्याची जडणघडण व संस्कार तसे त्याचा स्वभाव सोबत आवड निवड आहेत.
काही व्यक्ती इतिहासाला सत्य मानतात. अर्थात ज्यांच्या दृष्टीने माझा समज किंवा कोणत्याही मानवाचा समज अथवा कोणत्याही पुस्तकातील लिखाण म्हणजे सत्य त्याच व्यक्ती इतिहासाला सत्य मानतात. मात्र ज्यांना मानवी मर्यादा संदर्भात ज्ञान आहे त्या व्यक्ती इतिहासाला सत्य मानत नाहीत कारण सत्याची व्यापकता तसेच मानवी आकलन मर्यादा संदर्भातील जाणीव.
सत्य म्हणजे सर्वांगीण, परिपूर्ण, अपरिवर्तनशील. अर्थात निखळ परिपूर्ण हा एक शब्द पुरेसा आहे. जे परिपूर्ण आहे तेच सर्वांगीण तसेच अपरिवर्तनशील आहे. जेकाही अपरीपूर्ण आहे त्यामध्ये परिवर्तन घडते. तसेच ज्यामध्ये परिवर्तन घडते त्याला सत्य समजता-मानता त्या सत्याची किंमत काय?
इतिहासात अनेक घटना आहेत. अर्थात त्यामध्ये काही कथा, दंतकथा, भाकडकथा, आख्यायिका आहेत. काही घटना वास्तवात घडल्या तसेच काही काल्पनिक घटना आहेत. कोणत्याही काळातील कोणतीही घटना घ्या आपण ज्या दृष्टीने पाहू तसेच ज्या आकलन निकषावर तपासणी करू त्याप्रमाणे निष्कर्ष बदलणार आहे. कोणत्याही व्यक्तीचा कोणताही निष्कर्ष हा सर्वांगीण तसेच संपूर्ण नाही. तसेच कोणत्याही घटनेचे विश्लेषण हे एकांगी असते कारण मुळात कोणत्याही मानवाला एकांगी अभिव्यक्ती करता येते. काही मानव घटना असो की विश्लेषण अथवा अभिव्यक्ती यांना समग्र-संपूर्ण मानतात मात्र मानने व असणे यामध्ये अंतर आहे.
वर्तमान काळातील कोणतीही घटना पहा त्याचा भिन्न भिन्न दृष्टीकोनातून अभ्यास करून पहा. दृष्टीकोन बदलताच निकष व निष्कर्ष बदलतात. या घटनेत आपण कर्ता आहोत की साक्षीदार, निरीक्षक आहोत की समीक्षक, समर्थक आहोत की विरोधक, आपल्या दृष्टीवर पुर्वानुग्रहाचा चष्मा आहे की नाही यानुसार समस्त निकष ते निष्कर्ष बदलतात. वर्तमान घटनेची ही अवस्था आहे तर भूतकाळाची काय अवस्था असेल.
भूतकाळातील घटनांचा मागोवा घेताना आपण ना कर्ता आहोत ना साक्षीदार आहोत. इथे आपण निरीक्षक आहोत मात्र मानव निरीक्षक कमी समीक्षक अधिक आहे यामुळे कोणी का केले? कशासाठी केले? कसे केले? योग्य की अयोग्य केले? त्रूटी कोणत्या? या सगळ्यांचा व्यक्तिगत दृष्टीने अभ्यास करतो पण कर्त्या व्यक्तीला त्याचा स्वभाव तसेच आकलन संकल्पना होत्या याला दुर्लक्षित करण्यात येते.
कोणताही कर्ता कोणतीही कृती करतो त्यामागे त्याचा समग्र स्वभाव आहे. अर्थात कृती मागे प्रत्येकाचा उद्देश आहे. आम्हाला धड स्वतःचा उद्देश समाग्ररीत्या समजतो का?  उद्देशामागे असणारा अहंकार तसेच अज्ञान समजते का? घटनेमागे उद्देश प्रमाणे पार्श्वभूमी असते त्याचा समग्र मागोवा घेता येतो का? स्वतःच्या वर्तमान असो की भूतकाळातील घटनांचा भिन्न दृष्टीने अभ्यास करून पहा म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे.
इतिहासातील घटना घडल्या मात्र त्या का घडल्या किंवा कोणत्या पद्धतीने घडल्या याचा अभ्यास करताना तर्काचा आधार घ्यावा लागतो तसेच कोणताही तर्क हा शक्यता या वर्गवारीत मोडतो. तर्क तसेच वास्तव व सत्य यामध्ये अंतर आहे. हे अंतर समजणे व असणे इतकेच आहे. प्रथम स्वतःच्या नैसर्गिक मर्यादा पहा म्हणजे जाणीव होण्यास मदत मिळणार आहे.
वर्तमान समाजात इतिहासाला सत्य मानत एक माणूस दुसऱ्या मानवाची हत्या करतो तसेच सामाजिक हिंसाचार करण्यात येतो, समाजात तेढ निर्माण करण्यात येते, सामाजिक शांतता भंग करण्यात येते. जे घडून गेले त्याचा नीट अभ्यास न करता वर्तमान तसेच येणाऱ्या भविष्याला बिघडवण्यात येत आहे. अर्थात हे कळत-नकळत घडत आहे तसेच याला फक्त अज्ञान जबाबदार आहे. आपण आपले अज्ञान पहावे तरच त्यामध्ये सुधारणा करीत परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करता येणार आहे. अखेर आम्ही सुद्धा इतिहास जमा होणार आहोत. आपल्या सर्वांचा ऱ्हास होणार आहे.
इतिहास महत्वाचा नसून त्याकडे पाहणार दृष्टीकोन महत्वाचा आहे.

Comments

  1. इतिहास म्हणजे इति=याप्रमाणे,हा=असे,स=घडुन गेले. आता हे जे काही घडुन गेले ते केव्हा कधी कसे का किती कोणी कशासाठी कोणासाठी इ अनेक प्रश्नांशी निगडित असतं.या प्रश्नांची उत्तरं इतिहासाचा अभ्यासक सतत शोधत असतो हा शोध उपलब्ध पुरावे त्यांची सत्यासत्यता त्यांचा कालखंड त्या पुराव्यांचा अस्सलपणा सिद्ध करणारे मापदंड यांच्या आधारे ऐतिहासिक घटनांचा खरेखोटेपणा सिद्ध होतो. जोवर हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ती ऐतिहासिक घटना वस्तू इ. अस्सल मानली जात नाही आणि इतिहास तर्कावर नाही तर पुराव्यांवरुनच खरा किंवा खोटा ठरतो. तर्क कल्पना आहे आणि इतिहास सत्य आहे. आणि सत्याचा शोध घेताना विशिष्ठ दृष्टीकोन ठेवून जर शोध घेतला तर सत्य कधीच सापडणार नाही. सत्य जसं आहे तसंच स्विकारावं लागतं. एखाद्यानं लिहिलेला ऐतिहासिक दस्तावेज तपासताना त्याचा दृष्टीकोन आणि प्रत्यक्ष घटना आणि त्या दस्तऐवजाशी संबंधित पुरावे यांचा समग्रपणे विचार करावा लागतो. एखाद्यानं लिहिलं म्हणून त्याची छाननी न करता सत्य मानुन चालणं म्हणजे त्या इतिहास संशोधकाचा मुर्खपणा म्हणावा लागेल. किंवा जाणून बुजून इतरांना सत्यापासून भरकटवण्याचा पुर्वग्रह दुषित दृष्टीकोन. ज्या दृष्टीकोनाचा आजकाल वापर करून समाजाची हानी करण्यात अनेक महाभाग सामील आहेत. ज्यांना शासनदरबारीही मानमरातब बहाल करण्यात आले आहेत. अशा लोकांमुळेच इतिहास बदनाम होतो. अशा लोकांचा बुरखा फाडून सत्य समाजासमोर मांडुन भविष्यातील कलह मिटविण्यासाठी, भावी पिढीला उत्कर्षासाठी मार्गदर्शन करण्यासाठी इतिहास महत्त्वाचा आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते