आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी
सध्या समाजात घटना
घडल्यानंतर मंथन करण्याची प्रथा रूढ होत आहे. सामाजिक जीवन असो की व्यक्तिगत जीवन
असो घडल्यानंतर आम्हाला जाग येते तसेच घाई गडबड करीत समाधान शोधण्याचा प्रयन्त
करण्यात येतो तसेच यासंदर्भात, याक्षेत्रात, सुधारणा करण्याची गरज आहे याप्रकारचा
सल्ला देवाण-घेवाण ते चर्चा सत्र घडतात. या चर्चा सत्रात काही व्यक्ती आक्रमक
भूमिका घेत स्वतःच्या भूमिकेचे समर्थन देखील करतात. मात्र आपली भूमिका संदर्भात
खातरजमा करतात का? आपण केलेला अभ्यास कितपत सखोल आहे याबद्दल पुनर्विचार-चिंतन
करण्यात येते का? अर्थात नाही असे उत्तर मिळते.
अती घाई संकटात जाई
पण सर्वात प्रथम मी साठी घाई करण्यात येते. मीडियाचा हा रोग समाजाला देखील बाधित
करीत आहे. किंबहुना हा एक सामजिक रोग असल्याने मीडियात याचे अस्तित्व जाणवते. या
घाई गडबडीत मात्र आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार घडतो. उदाहरण घ्यायचे
झाले तर लोकपाल आंदोलन नुकतेच झाले तसेच सुरवातीला सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
पण कायद्याने भ्रष्टाचार नाहीसा होणार का? या संदर्भात किती चर्चा झाली? लोकपाल
सारख्या कायद्याने सरकारी यंत्रणा मधील भ्रष्टाचार काही प्रमाणात किंवा सगळा
नाहीसा झाला असे ग्राह्य मानू मात्र समाजातील भ्रष्टाचाराचे काय? तसेच देशातील इतर
कायद्यांची अवस्था काय?
भ्रष्टाचार ही
कृती-निष्पत्ती आहे. यामागे मानवी वृत्ती-प्रवृत्ती आहे. वृत्ती-प्रवृत्ती मागे
स्वभाव व संस्कार आहे. सत्ता माणसाला भ्रष्ट करीत नाही तर माणूस सत्तेला भ्रष्ट
करतो तसेच सत्तेमुळे मानवातील भ्रष्टता इतरांना जाणवते. मुळात समज भ्रष्ट असून जो
पर्यंत समाजातील भ्रष्टाचार नाहीसा होत नाही तो पर्यंत सत्तेमधील भ्रष्टाचार
नाहीसा होणार नाही. आज सगळ्या क्षेत्रात भ्रष्टाचार आहे किंबहुना तो एक शिष्टाचार
झाला आहे. याला निखळ सरकार जबाबदार आहे असा दावा करणे म्हणजे अकलेचे तारे
तोडण्याचा प्रकार होणार आहे. असो लोकपाल आंदोलन दरम्यान कमीत कमी स्वतःचा
भ्रष्टचार बंद करावा याप्रकारचे एक सामाजिक आवाहन करण्यात आले का? समाजाला
भ्रष्टाचाराचे बळी समजण्यात आले यामुळे असेल किंवा पाठींबा मिळणार नाही या भयाने
असेल अथवा वास्तव संदर्भात अनभिज्ञता असेल. काही असो आवाहन करण्यात आले नाही
यामुळे इथे आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असा प्रकार घडला.
दुसरे उदाहरण म्हणजे
कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न. यासारखे प्रसंग वारंवार निर्माण होतात त्यावेळी
पोलीस, प्रसाशानाचे, सरकारचे अपयश असा गदारोळ करण्यात येतो. लोकशाहीत नागरिकांना
काही कर्तव्य आहेत याचे आता आम्हाला विस्मरण होत आहे. समाजाने जर कर्तव्य पालन
केले तर असे प्रश्न निर्माण होतील का? इथे धड नवरा-बायकोचे पटत नाही यामुळे भांडण
होतात ती सुद्धा सरकारने सोडवावीत. का तर त्यांचे कर्तव्य आहे पण आपसातील सामंजस्य
सांभाळावे हे कोणाचे कर्तव्य आहे? कायदा व सुव्यवस्था संदर्भात प्रश्न-घटना घडताच
पोलीस-प्रसाशन यांच्या त्रूटी व सुधारणा याचे गुऱ्हाळ सुरु मात्र समाजातील त्रूटी
संदर्भात काय? समाजातील सामंजस्याचा अभाव आम्हाला आढळतो का?
थोडक्यात समाजातील
कोणतेही कार्यक्षेत्र पहा त्याठिकाणी कार्यरत असणारा माणूस त त्याची जडणघडण करणारा
सामाज या दोघातील त्रुटींचा अभ्यास केला तर वास्तवात सुधारणा करता येतील मात्र
समाजाला निर्दोष, निष्पाप, निरागस समजण्यात येते कारण मी याच समाजाचा एक घटक आहे.
जर समाजाला बोलावे किंवा सामाजिक त्रुटींचा मागोवा घ्यावा म्हणजे अप्रत्याक्षात
माझ्या त्रुटीचा मागोवा घेणे आहे तसेच सामाजिक सुधारणा म्हणजे अप्रत्याक्षात मला
माझ्यात सुधारणा करावी लागेल हे आमच्या अहंकाराच्या पचनी पडत नाही. मुळात मी
निर्दोष, निष्पाप, निरागस, योग्य, लायक असे संस्कार ग्रहण करीत आम्ही लहानाचे मोठे
होतो तर स्वतः मधील त्रुटींचा अभ्यास करणार कसे?
स्वतःशी प्रामाणिक
राहून विचार करून पहा की आपण स्वतः मधील त्रूटी-कमतरता यांचा अभ्यास केव्हा केला
होता? आम्हाला स्वतः संदर्भात चिंतन-परीक्षण करण्यास वेळ आहे का? आम्हाला स्वतः साठी
वेळ नाही. भले मनोरंजन असो की जागतिक घडामोडी ते पाहण्यास सवड तसेच आवड आहे मात्र
आत्मपरीक्षण करण्यास ना सवड, ना आवड. यामुळे ना त्रूटी कळतात ना सुधारणा घडतात.
वास्तवात समाजातील
प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण सुधारणा करण्याची गरज आहे पण याचा प्रारंभ स्वतः
पासून करवा लागतो. माणूस परिपूर्ण नाही यामुळे सुधारणा करण्यास वाव आहे मात्र तो
एका विशिष्ट समूह अथवा वर्गा पुरता मर्यादित नाही. ज्या व्यक्ती एका ठराविक समूह
अथवा क्षेत्र-वर्ग यांच्या कडून सुधारणांची अपेक्षा बाळगतात किंवा चर्चा करतात ते
स्वतःची तसेच समाजाची दिशाभूल करतात. यामुळेच आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा
प्रकार घडत आहे तसेच जर आम्ही स्वतः मध्ये सुधारणा केली नाही तर भविष्यात याची
पुनरावृत्ती घडत राहणार आहे. निर्णय आपल्या हाती आहे तसेच परिणाम देखील आपणच
भोगणार आहोत. थोडक्यात प्रणाली
सुधारणा करून माणूस सुधारणार की माणूस सुधारला तर प्रणाली सुधारणार आहे?
Comments
Post a Comment