स्पर्धा व मी


वर्तमान काळाला स्पर्धेचे युग समजले जाते. आज प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात स्पर्धा आहे. काही व्यक्ती जीवघेणी स्पर्धा असल्याचे मानतात तसेच स्पर्धा करतात व जीव जातो देखील. जाणारा जिवानिशी गेल्यानंतर कोणती व कशाची स्पर्धा करणार? असो स्पर्धा म्हणजे काय याचा कधी समग्र विचार करून पहिला का?
मी किंवा माझ्याशी निगडीत आहे त्यालाच मिळावे असा विचार किंवा भावना स्पर्धा निर्माण करते. मी किंवा माझा नसेल तर स्पर्धा नाही. कोणत्याही ठिकाणी स्पर्धा त्याठिकाणी मी आहे तसेच मी सोबत येणारा अहंकार तसेच अहंकाराची लक्षणे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात येणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. सर्वात प्रथम अज्ञान तसेच यामधून निर्माण होणारा तणाव.
स्पर्धा करण्यामागे योग्य तसेच पात्र व्यक्तीला मिळावे असा विचार किंवा भावना नसते तर मलाच मिळावे यासाठी स्पर्धा करण्यात येते. कोणत्याही स्पर्धेत गुणवत्ता हा निकष असतो का? नाही. गुणवत्ता असणारा व्यक्ती स्पर्धा करीत नाही तर प्रयन्त करून पाहतो. गुणवत्ता असणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने स्पर्धा नसते तर कसोटी-परीक्षा असते तसेच तो कसोटीला उतरण्याचा प्रयन्त करतो. स्पर्धा करणारा कसोटीला उतरण्यापेक्षा इतर मार्गांचा अवलंब करीत पदरात पडून घेण्याचा प्रयन्त करतो. या इतर मार्गात भ्रष्टाचारी, अनैतिक मार्गांचा समावेश आहे.
स्पर्धा करणारा एका दृष्टीने आंधळा असतो यामुळेच त्याला स्वतःच्या कृतीचीचे परिणाम व दुष्परिणाम ना दिसतात ना जाणवतात. स्पर्धा करणारा प्रसंगी स्वतःचे नुकसान करून घेतो व इतरांचे नुकसान केल्याचा संभ्रम कवटाळतो. मुळात स्पर्धा करण्यामागे अहंकार असल्याने इर्षा, द्वेष, घृणा, तिरस्कार ओघाने येतात. आपल्या द्वेष, तिरस्कार, घृणा याने इतरांचे नुकसान होतेच असे नाही कारण समोरचा व्यक्ती गुणवान असेल तर तो यापासून प्रेरणा घेत वाटचाल करतो म्हणजे आपली घृणा, द्वेष त्याला खतपाणी सारखे उपयुक्त ठरते. तसेच जो द्वेष करतो तो मात्र जळत राहतो.
अहंकार असो की द्वेष, घृणा, तिरस्कार हे मानसिक तसेच शारीरिक आरोग्यास हानिकारक असतात. अहंकार किंवा मलाचा पाहिजे ही भावना मानवाला तणावग्रस्त करते. तणाव त्याठिकाणी क्रोध, चीड-चीड पणा यातून कलह निर्माण होतो यामुळे तणावात भर पडत जाते.
जो व्यक्ती इतरां सोबत स्पर्धा करतो तो नेहमी दुसऱ्यांना प्राधान्य देतो यामुळे दुसरे काय करतात, दुसर्यांच्यात कोणत्या त्रूटी-कमतरता आहेत याचा मागोवा घेत बसतो मात्र स्वतःला तसेच स्वतः मधील त्रूटी-उणीवा-कमतरता यांना सरळ दुर्लक्षित करतो. मुळात अहंकार त्याठिकाणी स्वतःच्या कमतरता, त्रूटी बघण्यात येत नाहीत किंबहुना त्या नाहीत असा एक भ्रम असतो त्यामुळे ना त्या शोधल्या जातात ना त्यामध्ये सुधारणा करण्यात येतात प्रसंगी त्रूटी-कमतरता झाकण्याचा प्रयन्त होतो.
अर्थात जो माणूस मुळात इतरांचे अनुकरण करतो तो स्वतःचे परीक्षण करू शकत नाही. तसेच जो स्पर्धा करतो त्यामागे देखील अनुकरण आहे. सगळे करतात तेच मी करतो त्यामध्ये वावगे काय? असा सवाल करीत पळवाट शोधतो मात्र जे सगळ्यांचे होते तेच याचे होते. तणावग्रस्त जीवन, धावपळीचे जीवन, धकाधकीचे-वसवस करणारे जीवन मात्र या सगळ्यात जीवन आहे का?
थोडे स्वतःचे परीक्षण करून पहा नंतर निर्णय घ्या. आपण स्पर्धा करायची की गुणवत्ता प्राप्त करायची. जसा निर्णय तशी कृती त्याच प्रमाणे निष्पत्ती. उगाच काळाला दोष देऊ नका ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते