राजकारणाकडे विधायक दृष्टीने पाहण्याची गरज
सध्या महाराष्ट्रात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका
होत आहेत तसेच काही राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. नुकतेच टीम अण्णा यांनी
जे आंदोलन केले त्या काळात समाजाचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असल्याचे
निदर्शनास आले. तसेच आंदोलन कर्त्या व्यक्तींनी देखील नकारात्मक वातावरण निर्माण
करण्यास हातभार लावला. अर्थात तो त्यांचा उद्देश होता की नव्हता हा वादाचा,
चिंतनाचा तसेच मत-मतांताराचा विषय आहे.
टीम अण्णा आंदोलनाचे काही सकारात्मक तसेच नकारात्मक परिमाण
आहेत. अर्थात काही व्यक्ती सकारात्मक व नकारात्मक यांना भिन्न मानत यापैकी एकाच
स्वीकार-नकार करतात कारण एकांगीपणा तसेच वास्तव संदर्भात अज्ञान. असो ज्याचा
त्याचा स्वभाव व संस्कार तसे त्याचे आचरण. मात्र नाण्याला दोन बाजू आहेत तसेच
यादोन्ही बाजू विना नाणे उपयुक्त नाही किंवा त्याला मूल्य नाही. आपण आपल्या मताचा
तसेच इतरांच्या मताचा आदर राखावा कारण अपरीपुर्णत्व.
सध्या समाजात राजकारण म्हणजे नालायक, नाकर्ते, भ्रष्ट
लोकांचा भरणा असे मत निर्माण होत आहे. अर्थात त्यामध्ये तथ्य आहे मात्र समग्र
सत्यता नाही. वर्तमान राजकारणाची दुरवस्था नाकारता येत नाही मात्र याला फक्त नेते
तसेच राजकीय व्यक्तींना जबाबदार ठरवणे किंवा मानने म्हणजे अज्ञान व बेजबाबदार पणा
यांचे लक्षण आहे.
आपण लोकशाही देशात वावरतो यामुळे आपण आपले नेते निवडतो.
जोपर्यंत जनता नेता-प्रतिनिधी निवडत नाही तो पर्यंत ते पद कोणालाही मिळत नाही.
राजकारणात कार्यरत असणारे समस्त व्यक्ती याच समाजात जन्म घेतात, संस्कार ग्रहण
करतात यामुळे जेकाही समाजात घडते त्याला समाज देखील तितकाच जबाबदार आहे. समाजात
प्रत्येक व्यक्ती स्वार्थाला प्राधान्य देताना निखळ अधिकारांना प्राधान्य देतो ते
देखील सोयीस्कर अधिकारांचा वापर करण्यात येतो.
मतदान करणे हे कर्तव्य तसेच अधिकारात मोडते मात्र मतदानाची
टक्केवारी पहा म्हणजे वास्तवाचा प्रत्यय मिळणार आहे. जर समाज स्वतःचे कर्तव्य करीत
नाही तर याचा समाजात जन्माला येणारा नेता त्याची कर्तव्य पार पडणार का? ज्या
प्रमाणे समाजिक व्यक्ती संधीसाधू पणा करतात त्या प्रमाणे नेते संधीसाधूपणा करतात.
थोडे स्वतःचे परीक्षण करून पहा आपण कोणत्या सामाजिक व
राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करतो का? मुळात आम्हाला धड स्वतःची कर्तव्य तरी ज्ञात
आहेत का? याठिकाणी माहित आहेत ही ग्राह्यता नको तर परीक्षण करून खातरजमा करून
घ्यावी तसेच कोणी करीत नाही तर मी का करू? अशी पळवाट नको. लांबचे नाही तर आपण
आपल्या मुलांना वेळ देतो का? त्यांच्यावर कोणते संस्कार होतात याचा अभ्यास करतो
का? मुळात स्वतःला देण्यासाठी वेळ नाही तसेच स्वतःचे संस्कार समजत नाही त्यांच्या
कडून मुलांना वेळ व संस्कार यांची अपेक्षा करता येणार का?
राजकारण हे राजकारण आहे तसेच समाजकारणासाठी राजकारणाची गरज
आहे. अर्थात राजकारण ही मानव निर्मित एक प्रणाली आहे यामुळे ना ती कधी परिपूर्ण
होती ना परिपूर्ण असेल तसेच राजकारण हे राजकारण आहे व आपण राजकारणाकडे कोणत्या
दृष्टीने पाहतो त्यानुसार दिसणार आहे. राजकारणाचे परीक्षण करताना आपण कोणत्या
निकषावर करणार यानुसार निष्कर्ष मिळणार आहे. जे नकारात्मक पाहतात त्यांना
नकारात्मक दिसणार आहे तसेच त्यांचे निकष नकारात्मक असणार यात शंका नाही.
आपण नकारत्मक दृष्टीने पहावे की सकारात्मक दृष्टीने पहावे
हा व्यक्तिगत स्वभावाचा प्रश्न आहे परंतु जो निष्कर्ष मिळतो हेच सृष्टीचे सत्य मानने
मूर्खपणाचे एक लक्षण आहे. आज आम्ही जे काही स्वातंत्र उपभोगतो त्यामागे सुद्धा
राजकारण होते तसेच आहे व भविष्यात देखील असेल पण यामध्ये सुधारणा कराव्या लागतील
यासाठी प्रत्येकाला स्वतः मध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत. सर्वात प्रथम
दृष्टीकोन सकारात्मक करवा लागेल.
जो पर्यंत आपण सकारात्मक होत नाही तो पर्यंत सकारात्मक
परिणाम पाहण्यास मिळणार नाहीत. तसेच राजकारणात सकारात्मक बदल होणार नाही.
प्रत्येकाने स्वतःच्या कर्तव्याचा विचार करवा म्हणजे समाज कर्तव्याचा विचार करणार
आहे. यामुळे कर्तव्याचा विचार करणारे नेते निर्माण होतील तसेच पुढे येतील. मात्र
माझा अपवाद वगळता सगळ्यांनी कर्तव्य करावीत ही अपेक्षा असेल तर ये रे माझ्या
मागल्या होणार आहे. थोडा सकारात्मक विचार करून पहा.
Comments
Post a Comment