हमारा खून खून और तुम्हारा खून पाणी?
परवा एका नेत्याची
मुलाखत पहिली त्यावेळी हसावे की रडावे तेच समजेना. नेता स्वतःच्या कार्यकर्त्यांचे
मारहाणीत रक्त सांडल्याने दुसऱ्या नेत्याला दोष देत होता. गंमत म्हणजे या नेत्याचे
कार्यकर्ते हाणामारी करण्यसाठी प्रसिद्ध-कुप्रसिद्ध आहेत. हेच कार्यकर्ते
दुसऱ्यांचे रक्त सांडतात त्यावेळी त्यांच्या कृतीचा सार्थ अभिमान सांगणारा नेता
मात्र स्वतःच्या कार्यकर्त्याचे रक्त पाहून व्यथित होतो? आम्ही करतो ती
प्रतिक्रिया किंवा धडा शिकवणे मात्र तोच प्रकार दुसऱ्यांनी करताक्षणी गुन्हा.
थोडक्यात आमचे
सांडले तर रक्त आहे तेच दुसऱ्यांचे रक्त सांडून देखील पाणीच आहे. यासारखा प्रकार
फक्त एक पक्ष अथवा राजकारणात घडतो असे नाही तर समस्त समाजात यासारखे प्रकार घडतात.
तसेच यासारखे प्रकार फक्त भारतात घडतात असा नियम नाही. यासारखे प्रकार समस्त जगात
घडतात.
एक माणूस दुसऱ्या
माणसाला जी काही वागणूक देतो, तेव्हा त्यामध्ये योग्यता-न्याय असतो मात्र त्याच
प्रकारची वागणूक दुसरा माणूस आम्हाला देतो त्यावेळी अयोग्यता-अन्याय असतो.
वास्तवात याठिकाणी भेदभाव आहे मात्र तो ना पहिला जातो, ना समजावून घेतला जातो.
आम्ही एखाद्याची
पात्रता, लायकी काढतो किंवा वर्मावर बोट ठेवतो तसेच त्रूटी दर्शवण्याचा प्रयन्त
करतो प्रसंगी आवाक्यात येणारा असेल तर मारहाण करतो मात्र याच प्रकारची वागणूक इतर
व्यक्ती आम्हाला प्रदान करतात त्यावेळी मात्र आकाश-पाताळ एक करण्यासाठी
आकांड-तांडव करतो.
एक नवरा बायकोला
मारहाण करतो त्यावेळी अधिकार तसेच पुरुषार्थ मात्र हाच प्रकार एखाद्या स्त्रीने
केला तर? आई-वडील मुलांना मारहाण करतात कारण ऐकत नाहीत पण आई-वडील तरी मुलांचे
ऐकतात का? याठिकाणी नकारार्थी उत्तर असेल तर मुलांनी मारहाण करावी का?
कोणत्याही दोन
व्यक्ती मध्ये वाद होतो त्यावेळी माझ्या मताचा वा माझा अपमान झाला म्हणून मारहाण
करण्यात येते. तर कधी स्वाभिमान-अस्मिता यांचा प्रश्न असो की भावना भडकल्या या
नावाखाली धुडगुस घालण्यात येतो पण हाच प्रकार दुसऱ्या व्यक्ती करतात त्यावेळी दंगल
असते. मी करतो ते मंगल दुसरे तीच कृती करतात त्यावेळी दंगल?
एक समूह धर्म रक्षण
करतो त्यावेळी पुरुषार्थ मात्र तेच दुसरा समूह धर्म रक्षण करतो तो दहशतवाद. अर्थात
ज्यांना धर्म संदर्भात गैरसमज तसेच अज्ञान आहे तेच रक्षण करण्यास सरसावतात. सोबत
मानवा साठी असणाऱ्या धर्माच्यासाठी दुसऱ्या मानवाचा बळी घेतात.
दैनंदिन जीवनात
आम्ही अनेक कृती करतो व्यवसाय त्यापैकी एक. व्यवसाय करताना आम्ही कितीही नाफाखोरी
केली तरी चालते पण हाच प्रकार दुसऱ्याने करताच अन्याय, पिळवणूक असते. माझा तो
व्यवसाय मात्र दुसऱ्यांची ती पिळवणूक का? मी माझ्या फायद्यासाठी प्रसंगी नियमबाह्य
कामासाठी लाच देतो मात्र समोरचा तो भ्रष्टाचारी ठरवण्यात येतो.
मी इतरांना आमिष
दाखवतो त्यावेळी सगळे करतात तेच मी करतो मात्र दुसरे आमिष दाखवतात त्यावेळी मला
गाजर दाखवले, माझी फसवणूक केली असा आरोप करण्यात येतो. आम्ही प्रलोभनाला बळी पडतो
त्यावेळी समोरचा गुन्हेगार ठरवण्यात येतो मात्र आम्ही प्रलोभनाला भुललो नाही तर
समोरचा व्यक्ती गुन्हेगार ठरणार का?
थोडक्यात मी करतो ते
चांगले, न्याय संगत, योग्य मात्र मी जे काही करतो तेच दुसरा करतो त्यावेळी वाईट,
अन्याय, अयोग्य ठरवण्याचा प्रकार म्हणजे स्वतःचे ते रक्त मात्र दुसऱ्यांचे ते
पाणी? थोडे स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा त्याठिकाणी आपल्या स्वभावातील भेदभाव
तसेच अहंकार निदर्शनास येणार आहे.
आपण कोणतीही कृती करताना
पेरणी करतो तसेच त्याचा कालांतराने परतावा मिळतो तो देखील व्यापक प्रमाणात. जशाला
तसे तसेच शेरास सव्वाशेर हे लक्षात ठेऊन कार्य-कर्म करावे.
Comments
Post a Comment