अनावर अधीरता
वर्तमान जीवन शैली म्हणजे धावपळ-गतिमानता असे समजले जाते. काही व्यक्ती यापुढे जाऊन जीवन म्हणजे गती-धावपळ समजतात. वास्तवात जीवन हे फक्त जीवन असून त्याकडे पाहणारा दृष्टीकोन तसेच अन्वयार्थ घेणारे आकलन निर्णायक आहे. सध्या समाजात कोणत्याही ठिकाणी पहा माणूस सतत घाई-गडबड करण्याचा प्रयन्त करीत असल्याचे निदर्शनास येते. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी माणूस अधीर झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.
सामाजिक-राजकीय जीवनातील बदल असो की कृती ती झटकन झालीच पाहिजे. माझे एखादे काम असो ते झटकन झालेच पाहिजे. कोणत्याही दुकानात पहा, ग्राहक तत्परतेने सेवेची मागणी करतो. कोणत्याही व्यक्तीचे वक्तव्य असो की कृती शब्द कानावर पडता क्षणी किंवा घटना घडता क्षणी तत्परतेने प्रतिक्रिया देण्यात येतात.
कार्य क्षेत्र कोणतेही असो किंवा काम कोणतेही असो माणूस तत्परतेने करण्याचा प्रयन्त करताना अती घाई संकटात जाई याला सोयीस्कररीत्या दुर्लक्षित करतो यामुळेच वेगाने वाहन चालवताना असो की शब्दांचा वापर करताना अथवा काम करताना अपघात, विवाद, कामाचा खेळखंडोबा होत असल्याचे निदर्शनास येते. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी माणूस लगीन घाई करतो मात्र घटस्फोट सुद्धा होतो.
सध्या आज प्रेम, उद्या लग्न तर परवा घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढत आहे. मानवाल धीर धरणे किंवा प्रतीक्षा करणे सध्या जरा कठीण आहे. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी आपला नंबर येण्याची वाट न पाहता माझाच पहिला नंबर यासाठी गडबड करण्यात येते. यामुळेच माणूस मरण्याच्या बाबत असो की संकटाला सामोरे जाण्याबाबत असो मेरा पहेला नंबर करतो.
निसर्गातील कोणत्याही परिवर्तन मागे एक स्थिर गती-वेग आहे. कोणत्याही निष्पत्ती असो की उत्पत्ती असो त्यासाठी एक कालावधी लागतो त्याठिकाणी जर नैसर्गिक घटकांनी वेग वाढवला किंवा गती परिवर्तन केले तर काय होणार? पृथ्वीने स्वतः भोवती फिरण्याचा वेग वाढवला तर? किंवा ऋतू चक्राने परिवर्तनाची गती अधिक केली तर?
कार्यक्षेत्र असो की कोणत्याही प्रकारचे काम असो अथवा कोणत्याही प्रकारची घटना अथवा त्यासंदर्भातील प्रतिक्रिया देताना थोडा धीर धारावा. काही व्यक्ती धीर व संयम एकच मानतात मात्र गल्लत करतात. धीर धरणे किंवा स्वतःला नियंत्रीत करणे म्हणजे कृती आहे तर संयम एक निष्पत्ती आहे.
धीर असणे व नसणे याने खूप काही बदलते. टीम अण्णा आंदोलन करताना हेच संसदीय अधिवेशन नंतरचा कालखंड निवडला असता तर आंदोलनाची दिशा व दशा यामध्ये खूप काही साध्य झाले असते पण जे झाले ते सगळ्यांना माहित आहे. कोणत्याही ठिकाणी आपण प्रतिक्रिया देताना धीर धरला तर अनेक विवाद-भांडण-तंटे घडणार नाहीत.
काही व्यक्ती स्वतःची अधीरता झाकण्यासाठी कार्यतत्परता या गोंडस नावाचा आधार घेतात मात्र तत्पर असणारा व्यक्ती स्थिर व शांत मनाने काम करतो. आपण कोणत्याही कामात शांत तसेच स्थिर असतो का? या प्रश्नाचे उत्तर स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा. मानवाने धीर धरला तर तो मानव नियतीच्या धीराची देखील परीक्षा घेऊ शकतो. मात्र माणसाला धीर धरता येत नाही.
समाजात घडणारा हिंसाचार असो की बलाक्तार अथवा कलह, हत्या असो की आत्महत्या यामागे अविचारांचा एक क्षणिक अनावर मोह असतो तेच या क्षणात जर धीर धरला तर काही बिघडत नाही यामुळे काही घडत देखील नाही. प्रत्येक घडण्या-बिघडण्या मागे अनावर अधीरता आहे. मानवाच्या व्यक्तिगत असो की सामाजिक जीवनात अनावर अधिरतेची निर्णायक भूमिका आहे.
एक प्रयोग करून पहा, प्रत्येक ठिकाणी जाणीवपूर्वक धीर धरून पहा म्हणजे वास्तवाची प्रचीती येणार आहे.
Comments
Post a Comment