कायद्याचे तीन तेरा
भारतामध्ये कायदा व
सुव्यवस्था यांची अवस्था काय? कायदा राहतो पुस्तकात व माणूस म्हणतो काय द्याचे
बोला. भारतात जर कोणी कायदा उल्लंघन करताना सापडला तर तो सगळ्यात प्रथम कायद्याची
माहिती न घेता काय द्यावयाचे याची विचारणा करतो. मुळात आम्हाला कायद्याचे ज्ञान
कमी व काय द्यायचे याचे ज्ञान अधिक आहे किंबहुना यामुळेच आम्ही कायद्याचे पालन
करण्याच्या फंदात न पडता स्वतःची सोय साधताना प्रसंगी दुसऱ्यांची गैरसोय व्यापक
प्रमाणात करतो.
कोणताही कायदा
निर्माण करण्यामागे सामाजिक हित तसेच सामाजिक सुव्यवस्था निर्माण करणे व राखणे असा
व्यापक विचार असतो मात्र मानव हा उपजत संकुचित विचार करणारा प्राणी आहे यामुळे तो
कायद्याला बंधन समजतो. एक तर मणसाला बंधन आवडत नाहीत तसेच बंधन झुगारण्याचा
प्रयन्त माणूस करतो. प्रसंगी माणूस बंधन नाकारतो. कदाचित यामुळेच माणूस कायद्याचे
पालन करीत नाही.
एकीकडे माणूस
स्वतःला बंधन नको ही भूमिका घेताना मला बंधन नको मात्र इतरांना बंधन हवी आहेत असा
विचार ते आग्रह करतो. माझे आचरण म्हणजे स्वातंत्राचा एक भाग आहे तेच इतरांचे आचरण
म्हणजे स्वैराचाराचा एक भाग असतो. इथे मानवी स्वभावातील भेदभाव निदर्शनास येतो
अर्थात तो प्रत्येकाच्या निदर्शनास येतो असा नियम नाही. एखादा व्यक्ती कायद्याचे
उल्लंघन करतो हे अनेकांच्या निदर्शनास येते मात्र स्वतः जे काही कायद्याचे उल्लंघन
करतात त्यांना स्वतःचे उल्लंघन दिसत नाही तसेच ते मान्य देखील करीत नाहीत. ज्या वेळी
उल्लंघन केल्याचे मान्य करण्याचा प्रसंग निर्माण होतो त्यावेळी मात्र सगळे करतात
तेच मी केले तर त्यामध्ये वावगे काय? असा प्रश्न करण्यात येतात.
संकुचित बुद्धी तसेच
वृत्ती असणारा माणूस स्वतःची चूक ना पाहतो ना मान्य करतो याउलट खापर दुसऱ्यांच्या
माथी फोडण्याचा प्रयन्त करण्यात येतो. खापर फोडण्यास कोणी मिळाले नाही तर सरकार व
पोलीस खाते आहेच. कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाला
किंवा करण्यात आला तर सरकार व पोलीस यंत्रणेचे अपयश मानत वभाडे काढण्यात येतात
कारण सरकार व पोलीस यांच्या कर्तव्यातील कसूर समजण्यात येतो मात्र ज्या व्यक्ती
कायदा व सुव्यवस्था यांचे पालन करीत नाहीत त्यांना चकार शब्दाने बोलण्यात येत नाही
याउलट पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी असा आग्रह करण्यात येतो. पुन्हा
पोलिसांनीच कर्तव्य पार पडावे ही अपेक्षा मात्र आमच्यावर कर्तव्य पालनाची जबाबदारी
आहे की नाही?
आम्ही आपल्या
कर्तव्यांचे पालन केले तर कायदा असो की काय द्यायचे असो यासंदर्भात प्रश्न निर्माण
होणार नाही पण आम्ही अधिकाराला हावरे पण कर्तव्याला बावरे त्या देशात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा होत काय द्यायचे बोला ही
प्रवृत्ती बोकाळत जाणार यामध्ये शंका नाही. कायदा म्हणजे बंधन नाही तर कर्तव्य
आहे. कायदा म्हणजे समाजाला शिस्त लावणारे, वळण लावणारे एक माध्यम आहे.
कायद्याकडे
पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक करण्याची गरज आहे तसेच कायद्याचा आदर करण्याची गरज
आहे. जर प्रत्येकाने कायद्याचा आदर केला तसेच आदर करण्याचा संस्कार घडवला तर
कायद्याचे राज्य निर्माण होणार आहे पण समाजाला आदर करण्यापेक्षा उल्लंघन करण्यात
मजा वाटते तसेच मजा करण्याची किंमत मात्र सगळ्यांना मोजावी लागत आहे. ही किंमत कधी
काय द्यायचे या प्रवृत्तीला खतपाणी घालते
तर कधी इतरांची गैरसोय निर्माण करते. आम्ही स्वतः च्या अनुभवातून शिकतो की इतरांना
प्रमाणे स्पष्टीकरण देतो ते तपासून पहा म्हणजे प्रत्यय मिळणार आहे.
Comments
Post a Comment