सोय मधील गैरसोय
स्वतःची सोय पाहणे,
सांभाळणे, साधने हा मानवी स्वभावाचा एक अविभाज्य घटक आहे. सोय पाहताना,
सांभाळताना, साधताना कळत-नकळत तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात माणूस स्वतःची
तसेच इतरांची गैरसोय करतो फक्त ही गैरसोय अप्रत्यक्ष स्वरुपात असल्याने ना दिसते
ना जाणवते.
सामान्यतः मानव सोय
व गैरसोय यांना विरुद्ध अर्थी शब्द मानतो-समजतो वास्तवात विरुद्धता त्याठिकाणी
परस्पर पूरकता आहे. सोय व गैरसोय म्हणजे वास्तवात एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
सोय हे प्रत्यक्ष-दर्शनी स्वरूप असते त्यावेळी गैरसोय हे अप्रत्यक्ष-अदृश्य
स्वरुपात असते.
आपण नेहमी प्रवास
करतो-वाहन चालवतो विशेषतः शहरी भागात प्रवास करताना सोय मधील गैरसोय संदर्भात
सहजतेने प्रत्यय मिळतो. आपल्या देशात वाहतुकीला शिस्त किती आहे हे वेगळे
सांगण्याची गरज नाही. अर्थात कोणी हौस म्हणून नियम मोडतात तर काही व्यक्तिगत
उद्देश साध्य करण्यासाठी नियम मोडतात तर काही स्वतःची सोय साधण्यासाठी नियम मोडत
वाटचाल करतात. काही व्यक्तीच्या दृष्टीने नियम-कायदा यांच्याशी काही देणे-घेणे
नसते तर फक्त माझी सोय साधली म्हणजे झाले. यामुळे या व्यक्ती वेडे-वाकडे वाहन
चालवत अधेमधे घुसखोरी करीत फिरतात मात्र कुठे ना कुठे अडकून पडतात. या व्यक्ती
याठिकाणी स्वतःची चूक पाहण्याच्या फंदात पडत नाहीत वर वाहतुकीला वळण नाही असा शेरा
मारत फिरतात.
एखादा व्यक्ती सोय
पाहण्याचा, शोधण्याचा तसेच साधण्याचा प्रयन्त करतो त्यामध्ये यशस्वी झाला तर ठीक
अन्यथा गैरसोय होते. प्रत्येक प्रयन्त यशस्वी होतो असा नियम नाही. तसेच सोय साधणारा
प्रयन्त अप्रत्याक्षात गैरसोयला निमंत्रण देणारा ठरणार आहे. कारण सोय सोय
साधण्यातील अपयश गैरसोय निर्माण करते.
गैरसोय हा शब्द सोय
विना होत नाही. सोय असेल तर गैरसोय होणार आहे. आपण नेहमी आपल्या स्वतःच्या सोयींना
प्राधान्य देताना इतरांच्या सोय व गैरसोय यांना दुर्लक्षित करतो प्रसंगी यावरून
व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनात ताण-तणाव निर्माण होतो. थोडे इतरांच्या सोयीकडे
लक्ष देऊन पहा अर्थात यावेळी आपली काही प्रमाणात गैरसोय होणार आहे परंतु त्याविना
आपण स्वतःची सोय साधताना इतरांची कशी व कोणत्या प्रकारे गैरसोय निर्माण करतो त्याची
जाणीव होणार नाही. तसेच जर इतरांनी आपली स्वतःची सोय साधताना जर गैरसोय केली तर
ताण-तणाव, क्रोध येणार नाही.
आपण आपली सोय
साधताना दक्षता घेत इतरांची गैरसोय टाळण्याचा प्रयन्त करावा हे आपल्या कर्तव्यात
मोडते. मात्र आम्ही स्वतःची सोय साधण्यात इतके दंग असतो की आम्हाला कशाचेही भान
राहत नाही. तसेच आमच्या सारख्याच माणसाच्या कृतीचा आम्हाला त्रास होतो तेच आम्ही
करतो त्यावेळी मात्र सोय साधने असते, हेच इतरांनी आमची गैरसोय करता गुन्हा, प्रमाद
असतो. थोडे आत्म परीक्षण करून पहा म्हणजे सोय मधील गैरसोय लक्षात येणार आहे तसेच
यामुळे होणारा मनस्ताप, तणाव कमी होणार आहे. फक्त दृष्टी बदला सृष्टी बदलते.
वर्तमान काळात सृष्टी पेक्षा दृष्टी बदलण्याची गरज आहे. जर हे साध्य होत नसेल तर
थोडे इतरांच्या सोयींना प्राधान्य देऊन अनुभव प्राप्त करावा ही विनंती.
अखेर आपण सगळे
मिळूनच समाज निर्माण करतो तसेच समाजाची जडणघडण करतो. समाजात जे काही घडते-बिघडते
त्यामध्ये आपली भूमिका-जबाबदारी आहे. उगाच दुसऱ्यांकडे बोट दाखवत पळवाटा शोधू नये.
Comments
Post a Comment