वाढता अनादर


काळाच्या ओघात परिवर्तन हा एक निसर्ग नियम-स्वभाव आहे. मानवी जीवन परिवर्तनाला अपवाद नाही. मानवी सामुहिक-सामाजिक जीवनात जे काही परिवर्तन घडत आहे त्यापैकी एक परिवर्तन म्हणजे वाढता अनादर. कधी काळी भारतीय सामाजिक जीवनात एकमेकांना सहजतेने आदर प्रदान करण्यात येत होता. आदर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अट अथवा सशर्तता नव्हती. एक माणूस दुसऱ्या माणसाचा सहज आदर करीत होता.
वर्तमान समाजात आदर करण्यापूर्वी काही अटी, काही शर्ती असतात. अर्थात या स्वाभाविक पातळीला असणाऱ्या अटी व शर्ती आहेत. आज समाजात कोणीही कोणाचा सहजतेने आदर करीत नाही मात्र सहजतेने अपमान करण्यात येतो. कधी काळी मान देण्याचा प्रकार होता तोच आता अपमान देण्यात परावर्तीत होत आहे. तसेच कधी काळी सहजता ते आता सशर्तता असा परिवर्तन प्रवास आहे.
वर्तमान समाजात कोणीही कोणाचीही सहजतेने लायकी काढते. आपण कोणा संदर्भात काय बोलतो यांचे भान नसते. कोणत्याही वृत्त वाहिनीचा पत्रकार पहा त्यांच्या पेक्षा वयाने जेष्ठ असणाऱ्या व्यक्तीला देखील एकेरी संबोधन करणे, अरे-तुरे करण्याचा प्रकार पाहण्यास मिळतो. वृत्तवाहिनी असो की वर्तमान पत्र हे सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब दर्शवणारे आरसे आहेत. काही दिवसापूर्वी निवडणुका पार पडल्या त्यावेळी जी काही राजकीय संस्कृती पाहण्यास मिळाली ती देखील वाढत्या अनादारचे प्रतिक आहे.
आपण इतरांचा आदर अथवा अनादर करणे हा संस्कृती व संस्कार यांचा अविभाज्य घटक आहे. कोणताही मानव संस्कार व संस्कृती यामधील जे योग्य वाटते तसेच सुलभ आहे त्याचे अनुकरण करतो. मानवी स्वभावातील सोय-सुलभता व त्यामधून होणारे परिवर्तन याला देव-देवता देखील अपवाद नाहीत. कधी काळी देव-दर्शन घेताना साष्टांग दंडवत घालण्याची पद्धत होती मात्र आज न वाकता नमस्कार करण्याची पद्धत आहे. कधी काळी समग्र समर्पण करीत दर्शन घेणार माणूस आता साधा वाकण्यास, झुकण्यास तयार नाही.
सामाजिक स्वाभाविकता मधील वाढता अहंकार हा या सगळ्याच्या मुळाशी आहे. झुकणे, आदर देणे यामध्ये अहंकाराला अडचण भासते. वर्तमान समाजातील माणूस स्वतःचा अहंकार स्वाभिमान, अस्मिता, सशर्तता या गोंडस नावाखाली झाकतो. माणूस आहे त्याचा हुंकार भरण्याची संधी सोडत नाही प्रसंगी नसते त्याचा हुंकार भरतो तसेच हुंकार भरण्यासाठी संधी निर्माण करतो. हुंकार भरण्याची संधी निर्माण करण्याचा एक भाग म्हणजे इतरांचा अनादर करणे.
इतरांचा अनादर करून मान मिळवण्याचा प्रकार सध्या सर्रास पाहण्यास मिळतो. मात्र मानव इथे निसर्गाचा मुलभूत नियम-स्वभाव दुर्लक्षित करतो. आज आपण दुसऱ्यांना जे काही देतो ती फक्त पेरणी आहे तेच निसर्ग याचे फळ स्वरूप परतावा देताना कैक पटीने जास्त प्रमाणात प्रदान करणार आहे. एखादा व्यक्ती आपला अनादर, अपमान करतो त्यावेळी काय घडते किंवा काय वाटते हे मी सांगण्याची गरज नाही. समाजातील वाढत्या अनादर मुळे हा अनुभव सगळ्यांनी घेतला आहे.
थोडे स्वतःचे परीक्षण करून पहा आपण इतरांन काय प्रदान करतो? जे देणार तेच मिळणार आहे, न देता काहीच मिळत नाही. जे हवे ते मागण्यापेक्षा इतरांना प्रथम द्या म्हणजे तुम्हाला मिळेल. सामाजिक परिवर्तनाची दिशा व दशा आम्हीच निश्चित करतो फक्त मान्य करतो किंवा नाकारतो हा भाग वेगळा. आपण आपल्या परीने प्रयन्त करून वाटचाल करवी.

Comments

Popular posts from this blog

सरड्याची धाव कुंपणापर्यंत

अंथरूण पाहून पाय पसरणे

पेरावे तसे उगवते